
जालना | Jalna
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले आहे. आज (३० ऑक्टोबर) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच राज्यभरातून लोक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात येत आहेत. अशातच नांदेडहून (Nanded) आलेल्या रेखा पाटील नावाच्या महिला भगिनीने जंरागे पाटील यांची भेट घेतली. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आरोग्यसेविका असलेल्या रेखा पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांनी सरकारला मनोज जरांगे पाटील यांचा जीव घ्यायचा आहे का? असा सवाल सरकारला विचारला. तसेच इतर महिलांनी जरांगेंना काही झाल्यास विष पिऊन जीव देऊ, असा इशाराही दिला...
यावेळी महिला आंदोलक म्हणाल्या की, "आरक्षण मिळेल, पण मनोज जरांगेंची एक एक पेशी तुटून ते मरायला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना उपचाराची गरज आहे. आपण आज ना उद्या सरकारकडून आरक्षण घेणारच आहोत. परंतु आता आपण बघ्याची भूमिका घेणं म्हणजे आपला अतिशय नालायकपणा आहे, अतिशय मुर्खपणा आहे. आपण मनोज जरांगेंचा जीव गेल्यावर आरक्षण घ्यायचं का? आरक्षण बघण्यासाठी मनोज जरांगे जीवंत पाहिजे. त्यांनी तपासणीसाठी आणि उपचारासाठी नकार दिला आहे. मात्र, ते आपल्यासमोर जीव देत असतील, तडफडून मरत असतील, तर आपण सर्व बांधवांनी आणि शासनाने ते कसे तडफडून मरत आहेत हे बघायचं का? सरकारला तर त्यांचा जीवच घ्यायचा आहे हे स्पष्ट झालं आहे," असा, आरोप या महिला आंदोलकांनी केला.
तर यावेळी रेखा पाटील नावाच्या महिला म्हणाल्या की, सरकारने ४० दिवस काय केले. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? असा सवालही रेखा पाटील यांनी सरकारला विचारला. तसेच मनोज जरांगे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांचा बीपी अत्यंत लो झाला आहे. त्यांना तातडीने सलाईन लावणे गरजेचं आहे. अन्यथा माझ्या भावाचं काहीही होऊ शकतं. तुम्ही सगळं बंद करा आणि माझ्या भावाचा जीव वाचवण्याचं बघा, अशी साद देखील त्यांनी सरकारला घातली.