मुंबई
“पहिल्या लाटेपेक्षा आता कठीण परिस्थिती आहे. लवकर कठोर पावले नाही टाकले तर हॉस्पिटल बेड्सची संख्या कमी पडू शकते. कोरोनाबाबत लोकांची भीती दूर झाल्याने अडचणी वाढल्या. मागच्या वेळीपेक्षा पॉझिटिव्ह येण्याची संख्या वाढली. एकमेकांकडून लागण होण्याचे प्रमाणही वाढले. यामुळे ऑक्सिजन बेड कमी पडू नये, यासाठी उपाययोजना करत आहोत,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
लॉकडाऊनविषयी बोलताना पवार म्हणाले, “लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ. गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले.अनेक मंत्र्यांनी सूचना केली की किमान २ दिवस आधी सांगा. ही वेळ येऊ नये, असाच प्रयत्न आहे.
रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे शक्य : बाळासाहेब थोरात
लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होण्यास कमी होईल. आठवड्याच्या शेवटी दोन दिवस मोठे कार्यक्रम असतात, पर्यटनही वाढते. त्यामुळे गर्दी वाढते. यामुळेच आठवड्यातील शेवटच्या दोन दिवस लॉकडाउन करुन गर्दीवर नियंत्रण आणणे व निर्बंधामुळे कोरोना रुग्णांची साखळी आपण तोडू शकतो, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. लॉकडाउन कोणालाच नको आहे. पण, वाढती रुग्णसंख्या पाहता शेवटचा पर्याय हा लॉकडाउन असतो. त्यामुळेच कडक निर्बंध आणि आठवड्यातील शेवटचे दोन दिवस लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल महिना हा धोक्याचा आहे. प्रत्येकाने स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही थोरात यांनी केले.