मुंबई
तांत्रिक व इतर कारणांमुळे कोरोना मृतांमध्ये तफावत आढळून आली. गेल्या १६ दिवसांत ही तफावत दूर केल्यामुळे कोरोना मृतांच्या संख्येत ८ हजार ७४ ने वाढ झाल्याचे आज राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलाशा शासनाने केला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट जाहीर, पाहा अनलॉकसाठी नाशिक, नगर, जळगाव कोणत्या टप्प्यात?
यासंदर्भात शासनाकडून आलेल्या खुलाशात म्हटले आहे की, केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा कोरोना मृतांची माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो. रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
ताळमेळ प्रक्रिया साधारणपणे दर पंधरा दिवसांनी आई सी एम आर चे सी. व्ही. अनालिटिक्स पोर्टल ( बाधित रुग्णांच्या माहितीसाठी)
व कोविड १९ पोर्टल ( मृत्यूच्या माहितीसाठी ) या दोन्ही पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यातील माहितीची तुलना केली जाते आणि तांत्रिक कारणाने झालेले फरक दूर केले जातात. प्रयोगशाळा आणि रुग्णालये अनेकदा जुनी माहिती पोर्टलवर अद्ययावत करतात. ही माहिती राज्य अहवालात घेता यावी आणि राज्य अहवाल अद्ययावत करता यावा यासाठी ही ताळमेळ प्रक्रिया आवश्यक असते. मागील वर्षी मार्च २०२० पासून सुरू झालेल्या या कोविड साथीमधील प्रत्येक रुग्ण आणि मृत्यूचे रिपोर्टिंग होईल या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
सुधारित करण्यात आलेली मृत्यूसंख्या
26-05-2021- 539
27-05-2021- 459
28-05-2021 -549
29-05-2021 -389
30-05-2021- 412
31-05-2021 -316
01-06-2021 -377
02-06-2021 -268
03-06-2021- 336
04-06-2021 -1088
05-06-2021 -441
06-06-2021 -385
07-06-2021 -186
08-06-2021- 407
09-06-2021 -400
10-06-2021 -1522
*एकूण 8074*