तीन सदस्यीय प्रभागरचनेचा फायदा कुणाला?

तीन सदस्यीय प्रभागरचनेचा फायदा कुणाला?

नाशिक । फारूक पठाण Nashik

फडणवीस सरकाराच्या चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून अगोदर एक सदस्यीय प्रभाग रचना ward structure करण्यात आली होती, तर ऐन निवडणुकीच्या NMC Election तोंडावर तीन सदस्य प्रभाग रचना करून राज्य शासनाने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना खूश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. यामुळे कोणाचा फायदा व कुणाला नुकसान याबाबत राजकीय विश्लेषक कयास लावत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच MNS विरोध केला आहे, तर इतर सर्व पक्षांनी त्याचे स्वागत केले आहे. यामुळे आता यात बदल होण्याची शक्यता नसून तीन सदस्य प्रभाग रचनेनुसारच आगामी महापालिका निवडणूक होणार असल्याचे नक्की झाले आहे.

तीन सदस्य प्रभाग होणार असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. 2017 झाली 4 सदस्य प्रभाग रचनेनुसार नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यावेळी प्रत्येक प्रभागात अ, ब, क व ड या पद्धतीने वार्ड तयार करण्यात येऊन एक प्रभाग करण्यात आला होता. मात्र 2019 साली विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चार सदस्य प्रभागरचना रद्द होणार हे नक्की झाले होते. म्हणून प्रशासनही सतर्क झाले होते.

तर ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाच्या पत्राच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने देखील महापालिका निवडणूक एक सदस्य प्रभाग रचनेमुळे होणार असल्याचे पत्र आयुक्तांकडे पाठवून त्यानुसार कारवाई करण्याची सूचना केली होती. तसेच याबाबत गुप्तता ठेवण्याची सूचना देखील करण्यात आली. मात्र 22 सप्टेंबर 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळाने तीन सदस्य प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा तोच पेच निर्माण झाला आहे.

आता प्रशासनाला पुन्हा नव्याने रचना करण्याची गरज लागणार आहे. कारण दोन किंवा चार हे प्रभाग झाले असते तर प्रशासनाला ते सोपे गेले असते, मात्र आता तीन सदस्य प्रभाग झाल्यामुळे त्यांची चतु:सीमा ठरवून मतदार संख्या व्यवस्थित ठेवणे हे एक प्रकारे आव्हानात्मक ठरणार आहे.

सत्ताधार्‍यांना लाभ?

2022 ची महापालिका निवडणूक एक सदस्य प्रभागनुसार होणार असल्याचे अगोदर जाहीर करण्यात आले होते, त्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता तर आता तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याचे नक्की झाल्याने भारतीय जनता पक्षानेदेखील त्याचे स्वागत केले आहे. मोठ्या प्रभागांच्या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षाला फायदा झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन सदस्यीय प्रभाग रचना केल्याने राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सत्ताधारी पक्षांना फायदा होण्याची जास्त शक्यता आहे तर दुसरीकडे केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षालाही फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. चार सदस्य प्रभाग रचना हे भारतीय जनता पक्षाचा फार्म्युला होता, म्हणून तीन सदस्य प्रभाग रचनेचा त्वरित स्वागत करून आपण समाधानी असल्याचे दाखवून दिले.

अपक्ष, छोट्या पक्षांना फटका

साधारण तीस हजार मतदार संख्या या त्रिसदस्य प्रभाग रचनेत राहणार आहे. एका वॉर्डात साधारण दहा हजार मतदार राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे मोठ्या प्रभागात अपक्ष तसेच छोट्या पक्षांना यश मिळणे खूप अवघड जाते असे आजवरचे इतिहास आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत देखील छोटे पक्ष व अपक्षांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com