
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
ईशान्य (Northeast) भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील (Meghalaya, Nagaland) विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले होते. तर, त्रिपुरा (Tripura) राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झाले होते. आज दि. २ मार्च रोजी तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून, निकालाची स्पष्टता जवळपास समोर आली आहे.
त्रिपुरात भाजपा, नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी (National Democratic Progressive Party) (एनडीपीपी) आणि मेघालयात नॅशनल पीपल्य पार्टी (एनपीपी) आपली सत्ता राखण्यासाठीचे आकडे गाठण्याच्या स्थितीत पोहचले आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या ईशान्यकडील राज्यांच्या मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा मधील आजच्या निकालांमध्ये मेघालयमध्ये एकूण ५९ जागांपैकी नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party) ची २५ जागांवर आघाडी घेत क्रमांक एकचा पक्ष ठरण्याकडे वाटचाल झाली आहे.
या पक्षाच्या खालोखाल युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीने (United Democratic Party) ११ जागांची आघाडी घेत क्रमांक दोनच्या स्थानांवर आहे. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची केवळ ३ जागांपर्यंत आघाडी आहे.
त्रिपुरामध्ये एकूण ६० जागांपैकी, भाजपाने ३३ जागांवर आघाडी घेतली आहे, त्याखालोखाल १३ जागा TMP (Tipra Motha Party) ने, तर ११ जागांवर भारतीय कम्यूनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस ३ जागांवर आहे तर IPFT ने १ जागा हाती घेतली आहे.
नागालँड विधानसभेच्या निवडणूकतील एकुण ६० जागांपैकी NDPP ने २४ जागांवर आघाडी घेत क्रमांक एक वर पोहचली आहे, तर भाजपाने (BJP) या राज्यात १२ जागांवर आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसने (Congress) या राज्यात ७ जागांवर आघाडी घेतली आहे.
JDU एका जागेवर, राम विलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (Lok Jan Shakti Party) ने ३ जागा, नागा पिपल्स प्रंट २, नॅशनल पिपल्स पार्टी ५ जागा, तर चार अपक्षांनी देखील या राज्यात विजय निश्चित केला आहे.
विशेष म्हणजे नागालँड मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने २ जागा जिंकत देशाच्या राजकारणात प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे.
या तिनही राज्यांच्या निकालामध्ये भाजप ला त्रिपुरा वगळता इतर दोन राज्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही, कॉंग्रेस ची कामगिरी जेमतेमच राहीलेली या ही निकालांमध्ये दिसून येते, नॅशनल डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीने नागालँडमध्ये २४ जागांवर आघाडी घेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party) ची २५ जागांवर आघाडी घेत सत्तेकडे वाटचाल केली आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाने (Republican Party of India) २ जागा जिंकून आश्चर्याचा धक्का दिला आहे.