नाशिक | प्रतिनिधी
लॉक डाऊन करावे की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिकमधील लॉक डाऊनचा निर्णय पालकमंत्री, स्थानिक लोक प्रतिनिधी आणि प्रशासनाने घेणे अपेक्षित असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. ते आज नाशिक येथील करोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, तूर्तास तरी जिल्ह्यात लॉक डाऊन करणे आवश्यक वाटत नाही. गरज भासली तर लॉक डाऊनचा निर्णय घेतला जाईल.
यासोबतच बेड उपलब्धता व बिल नियंत्रणासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये प्रशासन दोन अधिकारी उपलब्ध करून देईल. एक अधिकारी बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल. दुसरा अधिकारी रुग्णांची बिले तपासून त्यांना सहकार्य करेल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
नाशिक मधील नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरू करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकार्यांनी आयएमए संघटनेची मदत घ्यावी असेही सुचविण्यात आले आहे.
करोना नियंत्रणासाठी प्लाझ्मा बॅंक केली जाईल. मालेगाव आपण करोनामुक्त केले. तेथील पोलिस व इतर कर्मचारी त्यांचा प्लाझ्मा घेऊन करोनावर मात केली जाईल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.