
नवी दिल्ली | New Delhi
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Local Body Elections) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान आज होत आहे. येथे ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला (Violance In West Bengal) असून, ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू (16 Death In Violance)झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप डाव्यांनी आणि भाजपने केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंचायतींच्या ७३,८८७ जागांसाठी मतदान पार पडत असून या निवडणुकीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तैनातीची मागणी करण्यात येत होती. केंद्रीय पोलीस दल तैनात असतानादेखील हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आल्यानंतर ही आज मतदानादिवशीची मोठ्या प्रमाणावर हिंसेचा आगडोंब उसळला.
अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटना घडल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील मतपेट्या पळवण्यात आल्या तर काही मतपेट्यांना आग लावून पेटवून देण्याचा सिनेस्टाईल थरात येथे पाहायला मिळाला. तर, काही बॅलेट बॉक्सची तोडफोड करुन त्यांना जवळील तलावातही फेकून देण्यात आल्या. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हे कृत्य केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, सीताई येथेही एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्यामुळे खूप वाद झाला.
दरम्यान, कूचबिहारमधील फोलिमारी येथे हिंसाचार भडकला असून, तिथे भाजपाच्या पोलिंग एजंटची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आले. पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाने बंगालमध्ये दहशतीचे राज्य स्थापन केले आहे. मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.
बंगालमधील राजकीय आणि निवडणुकीचे वातावरण हिंसाचाराने भरलेले आहे. ही लोकशाही आणि पंचायत निवडणुकांची फसवणूक आहे. हे निवडणूक गैरप्रकारांचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली. माकपचे पश्चिम बंगालचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनीदेखील निवडणुकीतील हिंसाचाराला तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. सलीम यांनी काही व्हीडिओ ट्वीट करत मतपत्रिका प्रकारे बळकावल्या गेल्याचा आरोप केला.