मुंबई | Mumbai
राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन कधी होणार? याकडे शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष लागले असून शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीच्या मशागतीची कामे सुरु केली आहेत. अशातच आता मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी महत्वाची माहिती दिली आहे…
याबाबत डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा चांगल्या प्रकारे पाऊस (Rain) पडणार असून येत्या २२, २३, २४ मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. तर १ ते ३ जून दरम्यान देखील राज्यात पाऊस कोसळणार असून ८ जून रोजी राज्यात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून चांगल्या प्रकारे पाऊस होईल, असे डख यांनी म्हटले आहे.
तसेच डख पुढे म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा (weather) अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. तसेच शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असे आवाहन डख यांनी केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे सध्या उन्हाचा पारा चांगलाच तापल्याचा पाहायला मिळत असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. त्यामुळे तापमान (Temperature) आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.