
नाशिक| प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून त्यामुळे टँकरची मागणीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात ५५ टँकरद्वारे ६४ गावे आणि ५० वाड्यांसह ११४ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. सर्वाधिक येवला तालुक्यात २० टँकर सुरू आहेत.जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात पाणीटंचाई झळ जाणवू लागली असून, टँकरला मागणी वाढू लागली आहे. जिल्हाभरातील सुमारे एक लाख २१ हजार ३०१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
नाशिक, दिंडोरी, कळवण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, निफाड हे सहा तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यात टँकर सुरु आहेत. सर्वाधिक २० टँकर येवला तालुक्यात सुरू आहेत. २९ गावे व १५ वाड्यांवर सात शासकीय व १३ खासगी अशा २० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. रोज साधारण ५२ टँकरच्या फेऱ्यांतून हा पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले राहिले त्यामुळे यावर्षी टँकरची संख्या कमी राहील, असे चित्र सुरुवातीला होते. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता फार जाणवली नाही. मात्र,पंधरा दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील विविध ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असून परिणामी पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर विशेषतः महिलांवर आली आहे. महिलांची ही वणवण कमी व्हावी, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी दैनंदिन वाढत आहे.
टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले असून टँकर मिळण्यासाठीच्या प्रशासकीय अडचणी यामुळे दूर झाल्या आहेत. ग्रामस्थांकडून टँकरची मागणी होताच लवकर टँकर मंजूर होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढती असल्याने ६४ गावे व ५० वाड्यांना ५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय १२ टँकर व खाजगी ४३ अशा एकूण ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याबरोबरच विहीर अधीग्रहणही करण्यात येत असून ४१ विहिरी गावांसाठी व टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या नऊ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रता सर्वाधिक जाणवत आहे. या गावांना १३४ टँकरच्या फेऱ्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत.