इगतपुरी | प्रतिनिधी Igatpuri
इगतपुरी (Igatpuri) तालुक्याला चेरापुंजी (Cherapunji) म्हणून ओळखले जाते. वर्षातले चार महिने इथे पावसाची संततधार असते. मात्र, उर्वरित आठ महिन्यात याठिकाणी धरणे उशाशी आणि कोरड घशासी अशी परिस्थिती निर्माण होत असते. तालुक्यातील अशी काही परिस्थिती खैरेवाडी (Khairewadi) या आदिवासी वस्तीवर आहे. येथील नागरिकांना अत्यंत गढूळ पाणी प्यावे लागत आहे....
इगतपुरीपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे. जनावरे सुद्धा आपले तोंड पाण्याला लावत नसून तहान भागत नाही.
या आदिवासी वस्तीवरील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून साडेतीन किमी जंगलातून पायी जावे लागते. एका आटलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन खाली उतरून गाळ मिश्रित पाणी त्यांना प्यायला लागते आहे.
या दुर्लक्षित पाड्यावर सरकारची मदत पोहचेल का? कारण मागील महिन्यात येथून 5 किमी अंतर असलेल्या बिवलवाडी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लावला. आमचाही पाण्यासाठी संघर्ष थांबेल का? हा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत.