Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपासाठी पाणी आरक्षित

नाशिक मनपासाठी पाणी आरक्षित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येची वर्षभराची पाण्याची तहान भागविण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेला गंगापूर धरणातून 3 हजार 800 दलघमी, दारणा धरणातून 400 दलघमी व मुकणे धरणातून एक हजार 300 दलघमी असे एकूण 5 हजार 500 दलघमी इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून 1399.89 दलघफु पाणी आरक्षित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्याने पिण्यासह उद्योग व शेतीसाठी देखील पाणी आरक्षित केले जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यातून सन 2020-21 साठी आकस्मिक व पिण्याचे पाणी आरक्षित करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यंदा सर्वत्र ठिकाणी पाऊस चांगला झाला असल्याने पाण्याची अडचण कुठल्याही भागात भासणार नाही. तसेच सर्वच लाभ क्षेत्रात देखील पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचीही चिंता नाही.

परंतु पाण्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी पिण्याचे पाण्याचे नियोजबद्ध आरक्षण करून त्याचबरोबर आकस्मिक मागणीचेही नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दारणा, चणकापूर, गंगापूर आणि पालखेड समूह असे चार विभाग केले जातात. यामध्ये मोठे प्रकल्प एकूण 15, मध्यम प्रकल्प 09, लघु प्रकल्प 77 तर कोल्हापूर पद्धतीचे 12 बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी 75 हजार 866 द. ल. घ. फू पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.

सध्या 72 हजार 581 द.ल.घ.फू पाणीसाठा असून गेल्यावर्षी पेक्षा 4.38 टक्के इतका पाणीसाठी कमी आहे. तसेच आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने व तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक मागणी लवकरात लवकर कळविण्याबाबतच्या सूचना भुजबळ यांनी अधिकार्‍यांना केल्या.

नाशिक पाटबंधारे विभाग, पालखेड पाटबंधारे विभाग व मालेगांव पाटबंधारे विभाग या तीन विभागांची मिळून शासनमान्य आरक्षणनुसार 15 हजार 220 द.ल.घ.फू मागणी असून आकस्मिक मागणी 4 हजार 891 द.ल.घ.फू एवढी आहे. त्यात नाशिक महानगरपालिक, थर्मल पावर स्टेशन एकलहरे, सिन्नर एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक यांत्रिकी संशोधन केंद्र, येवला वाईन पार्क, पालखेडवर मनमाड ग्रामपंचायत,येवला ग्रामपंचायत आणि मनमाड रेल्वेस्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित करण्यात येते. चणकापूरमधून मालेगांव पाणीपुरवठा, महानगरपालिका पुरवठा, सटाणा नगरपालिका , दाभाडी 11 गावे या मुख्य योजना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, कार्यकारी अभियंता (पालखेड) राजेश गोवर्धने, मालेगाव कार्यकारी अभियंता एम. एस. चौधरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या