
मुंबई | Mumbai
महिनाभरापूर्वी अजित पवारांसह (Ajit Pawar) काही नेत्यांनी राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर विरोधकांकडून वारंवार अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) होणार असल्याचे म्हटले जात आहे. पंरतु, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचे हे सर्व आरोप धुडकावून लावले जात आहेत. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी येणाऱ्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बदल होणार असून सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्य खुर्ची बदलणार, असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "कधी पुण्याचे (Pune) उपमुख्यमंत्री दांडी मारतात तर कधी नागपूरचे. तिन्ही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर मुख्यमंत्री येत नाहीत. त्यामुळे हा सगळा तमाशा महाराष्ट्राला दिसत आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी हे सर्व काही सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या १५ ते २० दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये बदल होईल. यामध्ये मुख्य खुर्चीपासून बदलायला सुरु होईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल हे ठासून सांगतो", असा दावा त्यांनी केला आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पूर्वी ओल्या दुष्काळाची परिस्थिती दिसत होती. आता काही जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात ११ जिल्ह्यात कमी पाऊस आहे. पीक हातात येईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने लवकर मदत करावी" अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.