मुंबई | Mumbai प्रतिनिधी
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली.
या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नायडूंवर टीका केली. या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे.
रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही, असे ट्विट वैंकय्या नायडूंनी केले आहे.
दरम्यान या सगळ्या वादावर उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण नको, असे म्हटले आहे.
मात्र व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवण्यासाठी राष्ट्रवादी युवकांच्या पोस्ट कार्यालयाबाहेर रांगा लावल्याचे चित्र आज दिसून आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जय भवानी. जय शिवाजी अशा आशयाचे शब्द पत्रात लिहून २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून ठिकठिकाणी युवक पदाधिकारी पोस्ट ॲाफिसच्या बाहेर उभे राहुन पत्र पाठवण्यासाठी रांगा लावून आहेत. संभाजी ब्रिगेड, शिवसेनेच्या नेत्यांनी देखील छत्रपतींबाबत अनादर केल्याचा निषेध केला आहे.