
मुंबई | Mumbai
सध्या राज्यात आणि देशात आगामी लोकसभांच्या (Loksabha) दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून अनेक राजकीय पक्ष तर युतीपेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्धार करत आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील येत्या निवडणुकांमध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नाशिक (Nashik) दौरा देखील करणार असल्याने नाशिकमधील वंचित बहुजन आघाडी पक्ष कामाला लागले आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिंदे गट, शिवसेना (Shivsena), मनसे, वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्षांनी राज्य पिंजून काढत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता VBA देखील महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील मैदानात उतरले असून आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात राज्यातील लातूर, सातारा, बीड आदी जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात ते दौरा करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात त्यांचा दौरा असणार असून ग्रामीण महाराष्ट्रापासून शहरी भागापर्यंत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते आहे.
वंचित बहुजन आघाडीने काही महिन्यांपूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासोबत युती केली. मात्र, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी देखील येत्या निवडणुकांमध्ये रणशिंग फुंकणार असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी जाहीर सभा, मेळावे, मोर्चे घेऊन पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे.
कसा असणार आहे दौरा
प्रकाश आंबेडकरांचा आजपासून दौरा सुरु होत आहे. लातूर जिल्ह्यात दौरा असणार असून यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संवाद साधणार आहेत. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी सातारा दौरा, ११ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याचा दौरा तर २८ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा असणार आहेत, यात प्रामुख्याने सटाणा शहरात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा दौरा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.