मुंबई | Mumbai
महिनाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला होता. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडला आहे. अशातच आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे...
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार, बुधवारपासून देशातील अनेक भागात हलका तर पश्चिम हिमालयीन भागात पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारपासून उत्तर-पश्चिम मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मंगळवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण मध्यप्रदेशच्या अनेक भागात वादळी वारे वाहू शकतात.
तर तामिळनाडू आणि केरळ या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये पुढचे ३ ते ४ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने हे देखील स्पष्ट केले आहे की, २४ एप्रिल म्हणजेच सोमवारपासून ते ३० एप्रिलपर्यंत देशात कुठेही उष्णतेची लाट (Heat wave) येण्याची शक्यता नाही.
तसेच २५ आणि २६ एप्रिल रोजी विदर्भातील भंडारा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याशिवाय २५ ते २८ एप्रिल दरम्यान विदर्भातील सरसकट सर्वच जिल्हामध्ये (District) यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २७ व २८ एप्रिल रोजी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.