नाशिक| Nashik
उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरवात झाली असतानाच ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीने महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा झोडपले आहे.
त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, चांदवड, बागलाण, निफाडच्या बहुसंख्य भागात अवकाळी पाऊस बरसला. तसेच पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने(Meteorological Department)वर्तविला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असणाऱ्या जायखेडा(jaykheda)सह परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. किमान पंधरा मिनिटे झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जायखेडा पाठोपाठ आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. बिजोटेत वीज वितरण कंपनीचे रोहित्र वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. तर करंजाड येथील शेतकऱ्याच्या घराचे पत्रे उडाले आहेत. यामध्ये कांदा, डाळींब पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
बागलाणमध्ये करंजाड, भडाणे, बिजोटे, आखतवाडे, निताणे, पारनेर, आनंदपुर भागात तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व गारपीटीने झोडपले. आखतवाडे, पारनेर, निताणे, भडाणे, या गावातही मोठ्या प्रमाणात घरांचे, तसेच शेतीशिवारात कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana)तालुक्यात वीज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली आहे.