पुणे
राज्यात आता अवकाळी पावसाचे संकट समोर उभे राहिले आहे. मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने विजांच्या कटकडाटासह हजेरी लावली.
यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटक किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक किनारपट्टी ते गोव्यामार्गे आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एकीकडे कोरोनामुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजनुसार राज्यातल्या अनेक शहरांत, ग्रामीण भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देशात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली.