
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात सध्या चांगलाच तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले आहे. आज (३१ ऑक्टोबर) रोजी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून कालपासून मराठा आरक्षणाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशातच आता या आंदोलनांची केंद्रीय गृहविभागाने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने ठिकाठिकाणी विविध मार्गांनी आंदोलन सुरु केले आहे. तसेच गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय राजकीय नेत्यांच्या घरांवर दगडफेक व जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून या संपूर्ण घटनांची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याचे बोलले जात आहे. तर या घटनांबाबत बोलतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोक आंदोलनाचा (Agitation) फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रकार करत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींना टार्गेट केले जात असून लुटीच्या घटना होत आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात मराठा आंदोलन चिघळल्याने विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला असतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या राज्याचा प्रचार महत्त्वाचा वाटतो. असे लोक समाजाला न्याय देऊ शकतील का? असे म्हणत निशाणा साधला. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी या घटनेला सगळ्या परिस्थितीसाठी देवेंद्र फडणवीस जाबाबदार असून ते अपयशी गृहमंत्री असल्याचे म्हणत आरक्षणासाठी ४० दिवस सांगून सरकारने जरांगे पाटलांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.