
मुंबई | Mumabi
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच पेटला असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी (Maratha Agitators) राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आमदारांचे घर, गाड्या जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेच्या (Shivsena) सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असून काल सोमवारी (३१ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाचा आदेश दिला. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर ३१ डिसेंबरआधी निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्यावर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, "सर्वोच्च न्याायलयाने जे आदेश दिले आहेत त्यावर बोलणं भाग आहे. अपात्रतेचा निर्णय तर आहेच, पण आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्व काय आहे, काय असणार आहे त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांती घटना व देशातील लोकशाही टीकणार की नाही हे ठरणार आहे. याकडे देशातील नागरिकांचं नाही, तर जगाचं लक्ष आहे. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही आहे आणि तीच लोकशाही धोक्यात आली असेल, तर आपण सर्वजण आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं याकडे सर्वांचे लक्ष आहे. लवाद सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानणार आहे की नाही? हे लवाद सर्वोच्च न्यायालयाचे (Court) आदेश न जुमानता आपल्या मर्जीने, आपल्या मस्तीने वागायला लागले तर आपल्या देशाचे होणारे हाल कुणालाही सावरता येणार नाही," असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, "राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे. काही ठिकाणी मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. अजूनही यावर काही मार्ग निघत नाही. मुख्यमंत्र्यांनी (CM) काल बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एका उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार ) डेंग्यू झाला होता. तर दुसरे उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) हे मराठा आणि महाराष्ट्रापेक्षा भाजपचा प्रचार करायला रायपूरला गेले. महाराष्ट्र जळत असताना, तरुण रस्त्यावर उतरले असताना पक्षाचा आणि दुसऱ्या राज्याचा प्रचार महत्त्वाचा वाटतो. असे लोक समाजाला न्याय देऊ शकतील का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी माझी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी असून पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे. जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढे करून देखील पंतप्रधानांवर परिणाम होणार नसेल तर सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा. महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जरांगे पाटील यांना विनंती आहे की टोकाचे पाऊल उचलू नका. तुमच्या सारख्या लढवय्याची राज्याला गरज आहे. राज्यात आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. जे जाळपोळ करत आहेत. त्यांना महाराष्ट्राला बदनाम करायचे षडयंत्र सुरू आहे. जेणेकरून उद्योगधंदे महाराष्ट्रात (Maharashtra) येणार नाही आणि हे उद्योगधंदे गुजरातला जातील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.