
मुंबई | Mumbai
राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु असून सर्वोच्च न्यायालय निकाल देणार की पुढील तारीख मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे दिल्लीत बीबीसीच्या (BBC) कार्यालयावर आयकर विभागाने धाड ( Income Tax Department Raid) टाकली असून कारवाई सुरु आहे.
त्यानंतर आता या करवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, गेले सहा महिने मातोश्री सेनाभवन येथे पक्षप्रवेशासाठी रीघ लागली आहे. अनेक जणांना महाराष्ट्रात जे काही झालं ते पसंत नाही, हे असंच सुरु राहिलं तर हुकूमशाही येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे देश वाचवण्यासाठी अनेकजण शिवसेनेसोबत येत आहेत, असे त्यांनी म्हटले.
तर पुढे बीबीसीच्या धाडीवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीची जी चार स्तंभ आहेत त्यात माध्यम महत्वाचा स्तंभ आहे. त्यातील एक स्तंभ असलेल्या बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडली आहे. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत (Democracy) बसतं? आवाज उठवला तर चिरडून टाकू. ही पाशवी वृत्ती थांबवावी लागेल, असा घणाघात ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला.