
जळगाव | Jalgaon
वर्षभरापूर्वी शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर आता राज्यातील आगामी निवडणूकांच्या तयारीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नव्याने पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची हिंगोलीनंतर आज जळगावात (Jalgaon) एका कार्यक्रमानिमित्त जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, यांच्यासह मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला...
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मधल्या काळामध्ये गुजरातमध्ये (Gujarat) सरदार वल्लभभाई पटेलांचा सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आला. आज भाजपने तर नाहीच नाही, त्यांच्या मातृसंस्था (आरएसएस) ने देखील आदर्श मानावे अशी व्यक्तिमहत्वचं उभी केली नाहीत. मग केलं काय, तर चोरीचं काम. इकडे वल्लभभाई चोरून घ्या तिकडे नेताजी सुभाषबाबू चोरून घ्या. आता तर माझे वडील चोरायला निघाले आहेत. म्हणजे ज्यांचा स्वतंत्र्यलढ्यात सुतराम संबंध नव्हता अशी लोकं, या आदर्श लोकांच्या जोरावरती स्वतःची दहीहंडी करत आहेत. मुळात कर्तुत्व काही नाही. वल्लभभाईंचा पुतळा तीनशे फूट, हजार फूट बांधा, पण त्यांच्या कामाच्या उंचीच्या जवळपासही तुम्ही फिरकू शकत नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझा जीव देश आणि जनतेसाठी जळत आहे. देशाला जाग करण्याचे काम वंशपरंपरागत माझ्याकडे आले आहे. मध्ये मुंबईत 'इंडिया'ची बैठक पार पडली. याचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. बैठक पार पडल्यानंतर गद्दारांनी शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसह बॅनर लावले त्यावर 'मी शिवसेनेची काँग्रेस (Congress) होऊ देणार नाही' असे लिहिले होते. २५ वर्षे शिवसेनेची भाजपा झाली नाही. मग, शिवसेनेची काँग्रेस कदापीही होणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत घेऊन हिंडवण्यासाठी केली नाही," असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, कधीकाळी युतीचे वैभवशाली दिवस होते. नाथाभाऊ, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसारखे नेते एकत्र दिसायचे, मात्र सध्या भाजपमध्ये सगळे उपरे आहेत फडणवीसांनी निष्ठावान नेते संपवले आणि उपरे उरावर बसवले," असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. तसेच एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जी २० परिषदेच्या गडबडीत असून आपले बेकायदा मुख्यमंत्री सुद्धा परिषदेला गेले आहेत. त्या ठिकाणी ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्याशी भेट झाली. भेटीदरम्यान काय बोलणं झालं? ते काय बोलले कळलं का? तुम्ही बोलले ते त्यांना कळले का? का? फक्त फोटो काढून आले, नुसती चमकोगिरी चालू आहे., असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
तर दिल्लीत सुरु असलेल्या जी २० शिखर परिषदेवरून देखील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "मोदींनी 'इंडिया'चा उल्लेख टाळत "भारत"असे संबोधले आहे. मात्र, आपल्या देशाचे नशीब आहे की मोदी 'भारत' तरी म्हणतात, मला वाटले की ते देशाला स्वत:चे नाव देतात की काय? आगामी निवडणुकीत आम्ही पण देशात बदल करणार असून पंतप्रधान बदलणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.