मुंबई | Mumbai
धारावीच्या (Dharavi) झोपडपट्टीचा पुनर्विकास (Slum Redevelopment) अदानी समुह करणार आहे. मात्र,या प्रकल्पाला शिवेसना उबाठा गटाने विरोध केला असून यासाठी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली आज धारावी ते बीकेसीतील अदानी समुहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा (Morcha) काढण्यात आला होता. यावेळी ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत भाजपच्या (BJP) जावयाला आंदण देण्यासाठी महाराष्ट्राने मुंबई मिळवली नाही, अशा शब्दांत हल्लाबोल केला…
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, अनेकांना या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली आहे? हेच कळत नाही. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) चळवळ झाली. त्यावेळेला म्हणजेच १९६० साली मुंबई (Mumbai) महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसाने रक्त सांडले, १०५ हुतात्मे झाले, हे हुतात्मा स्मारक तिकडे आहे ते कोणाचा तरी पुतळा उभा करायचा म्हणून केलेले नाही. मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिलं, रक्त सांडलं म्हणून आपण तिथं जाऊन वंदन करतो. त्या लढ्यात भाजप कुठेही नव्हता. लढायची वेळ आली की भाजप कुठेही नव्हता. मग ती दंगल असो काहीही असो. विकायची वेळ आली की हे पटापटा पुढे येतात. पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणूस, गिरणी कामगारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ती भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी नाही. भाजपच्या जावयाला अदाणीला हुंड्यात द्यायला म्हणून दिलेली नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे. वर्षा गायकवाड यांनी अदाणींना प्रश्न विचारला, तर भाजपा उत्तर देते. नशिब समजा तुमची स्थिती अजून महुआ मोईत्रांसारखी करण्यात आली नाही. महुआ मोईत्रांनी त्यांना (अदाणींना) प्रश्न विचारल्यावर निलंबित करण्यात आले. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.
ते पुढे म्हणाले की, आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदाणींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाही. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलतींना एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही. देवेंद्र आणि कंपनी म्हणतेय म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडत आहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”, असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी केला.