
मुंबई | Mumbai
शिवसेना-भाजपची (ShivSena-BJP) युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आल्याने कोसळले होते...
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आणखी कटूता निर्माण झाली आहे. त्यानंतर दोन्हीही नेते जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत.
त्यातच सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) हे दोघेही विधानभवनात एकत्र आल्याचे पाहायला मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंना माध्यमांनी फडणवीसांची भेट योगायोग होता का? असा प्रश्न विचारला असता त्यावर ठाकरे म्हणाले की, "पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी होते असे म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी बंद दाराआड चर्चा झाली तर बोलू", असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे ठाकरेंना माध्यमांनी हे युतीचे संकेत आहेत का? असा प्रश्न विचारला असता होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केले. कोणाला हाय, हॅलो म्हणणेही आता पाप झाले आहे का? हेतूपरस्परच अशा गोष्टी कराव्यात का?" असे त्यांनी सांगितले.