नवी दिल्ली । वृत्तसंस्था
पुढील एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अमलजबावणी केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. लोकसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.
मी सभागृहाला आश्वस्त करु इच्छित आहे की, पुढील एक वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवले जातील. याचा अर्थ टोलवसुली जीपीएसच्या माध्यमातून केली जाईल. जीपीएसमधून काढण्यात येणार्या फोटोंच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातील, असे गडकरी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिले. टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचे सांगत नितीन गडकरींनी युपीए सरकारवर निशाणा साधला.