Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाँँग्रेसचा आज राजभवनाला घेराव

काँँग्रेसचा आज राजभवनाला घेराव

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

वाढती महागाई( Inflation ), बेरोजगारी ( Unemployment ), ढासळती अर्थव्यवस्था (faltering economy)आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी ( GST )लागू करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून आज, शुक्रवारी राजभवनाला घेराव घालण्यात येणार आहे. काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole )यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात येईल.

- Advertisement -

संसदेत वाढत्या महागाईचा उपस्थित करून काँँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसच्या वतीने आज देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज आले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा आणि नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे पटोले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून त्यांच्या बोलण्यातून भाजप आणि आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते, अशी टीकाही पटोले यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या