
नाशिक | Nashik
बारावीच्या परीक्षा (12th Exam) 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. मात्र, परिक्षा सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभारासंबधी गलथान बाबी समोर येऊ लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढत.
सुरवातीला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका, नंतर बीड येथे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Boards of Secondary and Higher Secondary Education) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असताना आता, या बारावी परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन (Junior College) शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बारावीच्या परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास त्याचा थेट परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे बोर्डाने निकाल वेळेवर जाहीर होतील असा दावा केला आहे.
राज्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका (Model Answer Sheet) तयार करुन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बारावीचा निकाल लागतो. यावर्षी 14 लाख 75 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.
मात्र, आतापर्यंत ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या उत्तरपत्रिका महाविद्यालयात तपासण्यासाठी पोहचल्या आहेत. मात्र, शिक्षकांकडून त्या तपासण्यास नकार देण्यात आला आहे. काही उत्तरपत्रिका (answer sheets) बोर्डाच्या कार्यालयात असून काही पोस्ट ऑफीसमधे पडून आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणी करायला कुणीच नाही याचा परिणाम निकालाच्या कालावधीवर होईल असे बोलले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या (Minister of Education) बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अजून मिळालेले नाही. त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत, त्यामुळे इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल आणि आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून लढा देत आहेत. अनेकदा निवेदन देऊन, आंदोलन करूनही त्यांना सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षकांनी पेपर तपासणीवर परीक्षा सुरु होण्याचा काही काळ आधी बहिष्कार टाकला. परिक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका तयार करुन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते मात्र नियामकांची बैठक होत नसल्याने उत्तरपत्रिकांचे पाकिटे पडून आहेत यामुळे यंदा बारावीचा निकाल (12th Result) वेळेवर घोषित करण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला पेलावे लागणार आहे.