वयात येण्या आधीच मुली बेपत्ता होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातल्या अनेक मुली अल्पवयीन असतांना लग्नही करुन मोकळ्या होतात. तर दुसरीकडे आता लग्न झालेल्या महिला बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. किती मुली, महिला मजबुरीतून जातात आणि किती प्रेमाला बळी पडतात, हा खर्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे. वयात येण्या आधी मुलींवर होणारे अत्याचार त्यातून त्यांची बिघडणारी मानसिकता, प्रेमाच्या अमिषापोटी कुटुंबियांवरच दाखल होणारे गुन्हे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण फसविले गेल्याचे निदर्शनास आल्यानंतरची परिस्थिती, हे सारेच गंभीर आहे. श्रध्दा वालकरच्या प्रकरणानंतर अशा घटनांकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची निघृण हत्येचा विषय सध्या देशभर चर्चेचा ठरला आहे. सोशल मीडियावर तर अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या धक्कादायक घटनेनंतर मिसिंग आणि पळवून नेलेल्या मुली आणि महिलांचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. धुळे जिल्ह्याचाच विचार केला असता जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात 123 मुलींचे अपहरण झाले आहे. त्या पैकी 38 गुन्हे उघड झाले आहेत. तर 85 मुलींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
पळवून नेलेल्या या मुलींचे वय 15 ते 17 वर्ष आहे. तर जिल्ह्यात बेपत्ता होणार्याचीही संख्या मोठी आहे. गेल्या दहा महिन्यात मिसिंगच्या तब्बल 496 नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यात 312 महिला व 158 मुलीं व पुरुष आणि मुलालां देखील समावेश आहे. यापैकी केवळ 60 व्यक्ती मिळून आले आहे. तसेच विवाहित महिला बेपत्ता होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या अद्याप थांगपत्ता न लागलेल्या या महिला, मुली कोणा आफताबच्या जाळ्यात तर नाही ना, अशी भीती आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात अनेक दिवस लॉकडाऊन होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे गुन्ह्यांत घट झाली होती. परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून सर्व निर्बंध उठवण्यात आले. शाळा महाविद्यालय, खासगी क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातही अल्पवयात मुली-मुलांचे आकर्षण वाढत आहे. कमी वयात समज नसल्याने मुलींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तरुण मुलींचे अपहरण करत आहे.
यातील बहुतांशी मुली प्रेमप्रकरणातून घर सोडून गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. जिल्ह्यात 1 जानेवारी ते 6 नोव्हेंबर या कालावधीत 123 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्यांत करण्यात आली. कोरोना काळात सोशल मीडियावर प्रेमसंबध जुळण्याचे प्रकार वाढले होते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहून थेट भेट होत असल्याने तसेच लग्नाचे व इतर आमिष देत मुलींना पळविण्याचे आणि पलायनाचे प्रकार वाढत आहेत. या दरम्यान काही मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्या नंतर अनेक अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत वाढले गुन्हे- सन 2020 ते 21 या वर्षात कोरोना काळात अपहरणाच्या गुन्ह्यात घट झाली. 2022 मध्ये 123 मुलींचे अपहरण झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यापैकी 35 मुलींना शोधण्यास पोलिसांना यश आले. याबरोबरच 1 जानेवारी ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान 493 मिसिंगची नोंद झाली आहे. त्यात महिला, विवाहिता 312, मुली 158, पुरुष 258 व 86 मुले बेपत्ता झाली आहेत. तर 60 मिळून आले असून अद्याप 156 मिळून आलेले नाही. मिळून आलेल्यामध्ये 22 महिला, 13 मुली, 16 पुरुष व 4 मुलांचा समावेश आहे.
दररोज एक ते दोन मुलींचे अपहरण
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या आणि मिसिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिंताजनक स्थिती आहे. अपहरणच्या घटनात 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. दररोज सरासरी एक ते दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण होते.यातील बहुतांश प्रकरणांमध्ये लग्नाचे आमिष दाखविले जात असल्याचे दिसते. तर या पेक्षा जास्त मिसिंगच्या घटनाही घडत आहेत.
ही आहेत कारणे
समाजमाध्यमांचा अतिवापर, पालकांचे मुलांकडे झालेले दुर्लक्ष, शाळा- कॉलेजांमध्ये तरुणांचा सहवास जास्त, चित्रपटातील प्रेमकथांचा विपरित परिणाम ही कारणे आहेत. त्यामुळे आता मुलींची सुरक्षितता वाढण्यासाठी मुलींना केवळ कायदेशीररीत्या संरक्षण देऊन भागणार नाही.
कारण आज देशामध्ये मुलींच्या संरक्षणासाठी कायद्यांची कमी नाही. त्यामुळे मुलींचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. याबरोबरच महिला, मुली व पालकांनी देखील तेवढेच जागृत राहणे आवश्यक आहे, असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
पालकांची जबाबदारी वाढली
अशा घटनांमुळे आता पालकांची जबाबदारी वाढली आहे. ती संशय म्हणून नाही तर खबरदारी म्हणून आपण म्हणत आहोत. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या मित्र-मैंत्रिणींची माहिती ठेवावी. त्यांच्याही संपर्कात रहावे. आपल्या मुला-मुलींचा मोबाईल अधून-मधून सहज हाताळावा, ते जर जास्त वेळ किंवा एकांतात जावून मोबाईलवर बोलत असतील ते कोणाशी बोलतात, महाविद्यालय, क्लासेसला वेळेत जाता-येतात का, याचीही माहिती ठेवणे आवश्यक आहे. मुलांसोबत पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणे, आवश्यक आहे.