...तर पुन्हा संकटमोचक

...तर पुन्हा संकटमोचक

राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चर्चा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत 'दुसरा' मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aaghadi Government )कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नव्याने अस्तित्वात येणार्‍या सरकारमध्ये नाशिकचा पालकमंत्री कोण? (Who will be the Guardian Minister of Nashik?) यावर जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे. नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच राहणार हे खरे, पण पालकमंत्री नाशिकचा की बाहेरचा? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कुठेही काही झाले की आपले काय ? असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. हा मानवी स्वभाव आहे. असाच प्रश्न आता जिल्हावासीयांना सतावू लागला आहे. राज्यात तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी अडीच वर्षांपासून सत्तेवर आहे.ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे,त्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत आपल्या समर्थक आमदारांना बरोबर घेत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार आता कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन सरकार निर्माण होणार आहे.

राज्यात एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे नाशिकचा पालकमंत्री कोण? नाशिक जिल्ह्याला या नव्याने निर्माण होणार्‍या सरकारमध्ये मंत्रीपदाची किती प्रमाणात लॉटरी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद यापूर्वी शिवसेनेकडेच राहिलेले आहे. त्यामुळे आता नाशिकचा होणारा पालकमंत्री हा शिवसेनेचा की भाजपचा याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्यात भाजपचे पाच तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत.राज्याचा विचार करता सर्वाधिक आमदार हे भाजपाचे आहेत.नाशिक जिल्ह्याला एक वेगळे महत्त्व असल्याने नाशिकचे पालकमंत्रीपद ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदार आहे, त्याच पक्षाकडे जाते हा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे.

नाशिक शहरात देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले या तीन आमदारांसह चांदवड-देवळा मधून डॉ. राहूल आहेर तर बागलाणमधून उमाजी बोरसे असे पाच आमदार भाजपचे तर मालेगाव बाह्यमधून विद्यमान कृषी मंत्री दादा भुसे आणि नांदगावमधून सुहास कांदे हे शिवसेनेचे दोन आमदार आहेत. यामुळे नव्याने निर्माण होणार्‍या सरकारमध्ये सात आमदार हे नाशिक जिल्ह्याचे राहणार आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद हे जिल्ह्यातील आमदारालाच मिळणार की बाहेरून येणार्‍यास याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नाशिक जिल्ह्यामधून पाच आमदार भाजपचे असल्याने भाजपच्या वाट्याला एक की दोन मंत्रिपद याकडे लक्ष लागले आहे.यामध्ये प्रा.देवयांनी फरांदे,डॉ. राहुल आहेर यांना मंत्री पदाची लॉटरी लागून ते पालकमंत्री होऊ शकतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

...तर पुन्हा संकटमोचक

जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचाच हिणार हे निश्चित असून फरांदे की आहेर की ,शेजारच्या जिल्ह्यातून पालकमंत्री येणार अशी शक्यता आहे. असे जर झाले तर माजी पालकमंत्री गिरीश महाजन हेही पुन्हा नाशिकचे पालकमंत्री झाले तर नवल वाटायला नको. मात्र, एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजप आणि बंडखोर शिवसेना यांचे सरकार निर्माण झाले तर जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नुकतेच विधान परिषदेत निवडून आले असल्याने त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते. त्यामुळे गिरीश महाजन यांना जळगावचे की नाशिकचे पालकमंत्री करणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com