मुंबई | प्रतिनिधी
आरोग्य विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे पुढील महिनाभरात भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या उत्तरात दिली.
करोनावर लस निर्माण करणाऱ्या दोन निर्मात्या कंपन्यांच्या क्लिनिकल ट्रायल संपल्या आहेत.त्यांनी केंद्राकडे लस देण्याची अनुमती मागितली आहे.राज्य सरकारनेही लसीकरणाची पूर्ण तयारी ठेवली असून केंद्राच्या परवानगी नंतर ज्या प्रमाणे मतदान होते त्या प्रमाणे बूथ उभारून लस देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
करोनाचा ग्रोथ रेट आटोक्यात आणण्यास राज्य सरकारला यश मिळाल्याचे सांगून राजेश टोपे म्हणाले, कोरोना चाचणीचे दर कमी केले आहेत.एचआरसीटीचा रेट ८ ते १० हजार होता तो आता २ हजारावर आणला आहे.मास्कच्या किंमतीही कमी करून आता एन ९५ मास्क हा१९ रूपये तर थ्री प्लाय मास्क आता ३ ते ४ रूपयांपर्यंत मिळायला लागला आहे. तसेच सरकारी रूग्णालयातील रूग्णांना रक्तही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात ८२ टक्के रूग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत.खासगी रूग्णालयांच्या बिलांवरही नियंत्रण ठेवण्यात आले आहेत.राज्यात डेथ ऑडिट कमिटी असून कोरोनाने होणा-या प्रत्येक मृत्यूचे ऑडिट करण्यात येत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.