मुंबई । वृत्तसंस्था Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा एमपीएससीकडून ( MPSC )रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधीची ही घोषणा करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससीच्या धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती. आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत.