औरंगाबाद - aurangabad
गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्येही असाच एक भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. रस्त्याशेजारी असलेल्या नदीपात्रामध्ये कार जाऊन, त्यातील तीन प्रवाशांना जलसमाधी मिळाली. ही घटना करमाडजवळील जडगाव येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
वैजिनाथ उमाजी चौधरी (५२), मंगल वैजिनाथ चौधरी (४५) आणि सुकन्या मधुर चौधरी (२१, तिघेही रा. शेलुद, ता. औरंगाबाद, ह. मु. गजानन नगर) अशी मृतांची नावे आहेत. ते कारने देवीच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ते कारने (एमएच १४ ९६५८) जात असताना, जडगाव येथे त्यांची कार नदीच्या पाण्यात गेली. ही कार नदीपात्रात गेली, त्यामध्ये या तिघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कार काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसहा वाजता अग्निशामक दलाने ही कार नदीपात्रातून बाहेर काढली. ही कार नदीतील ४० फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली होती, असे सांगण्यात आले. ही कार बाहेर काढण्यासाठी दिनेश मुंगसे, अब्दुल अजीज, लक्ष्मण कोल्हे यांनी मेहनत घेतली. दरम्यान, एकाच कुटुंबातील लोकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.