
मुंबई | Mumbai
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पदाची अदलाबदल करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे उरलेले सर्व आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...
उदय सामंत (Uday Samant) यांना पत्रकारांनी खारघर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवले जाईल अशी चर्चा सुरू आहे, असे विचारले. त्यावर बोलतांना सामंत म्हणाले की, ठाकरे गटातील उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अशा अनेक चर्चा सुरु आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपमधील (BJP) वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिंदे यांना सोबत घेऊन भाजपला काहीही फायदा होणार नसल्याची बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आली आहे. याशिवाय आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानभुतीचा फायदा होणार असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.