नवी दिल्ली
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. सिंधू बॉर्डरवर स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये जोरदार प्रदर्शने झाली. आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबची झाली. यादरम्यान तुफान दगडफेक, लाठीचार्ज झाला. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूर आणि बळाचा वापर करावा लागला. या घटनांमध्ये पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. शेतकरी आंदोलनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दुपारी २ च्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांच्या तंबूजवळ गेले आणि त्यांचं सामान तोडायला सुरूवात केली. यानंतर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली, ज्यात दगडफेकही करण्यात आली.
सिंधू बॉर्डरवरून शेतकऱ्यांनी बाजूला व्हावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सिंधू बॉर्डर पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ‘खलिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा स्थानिक आंदोलक देत आहेत.