पंचाळे । वार्ताहर Sinnar / Panchale
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत व इतर समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मराठा समाजाला नोकरीत व शिक्षण इतर ठिकाणी आरक्षण मिळावे म्हणून आत्तापर्यंत मराठा समाजाने 58 मुक मोर्चे यापूर्वी काढलेले आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाचे लोक एकत्र आले.
मराठा समाजाला नोकरीत, शिक्षणात आरक्षण मिळावे म्हणून सर्व समाज घटकांनी त्यास पाठिंबा दिला आहे. त्यानुसारच मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले होते. सध्याच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अंतरिम स्थगिती दिली आहे.
राज्यातील संपूर्ण मराठा समाजाकडून याबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व नोकरीमधील नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने काळजी घेणे महत्वाचे आहे.
राज्य शासनाने विविध पदांच्या नोकर भरती प्रक्रिया व अभ्यासक्रमांचे प्रवेश याबाबत विस्ताराने आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांची व उमेदवारांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी राज्य शासनाने घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे व मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना व उमेदवारांना न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये चर्चा करून मराठा समाजातील युवकांना न्याय देण्याची गरज असल्याचे कोकाटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.