
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सुसंस्कृत व सकारात्मक दृष्टिकोनातून स्वराज्य संघटना काम करणार असून कुठल्याही राजकीय पक्षांना आमचा विरोध नाही. मात्र, या पक्षाच्या बरोबरीने वाटा घेणार असून सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हा स्वराज्याचा असेल, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले...
यावेळी ते म्हणाले की, ५२ वर्षानंतर कोल्हापूर (Kolhapur) बाहेर वाढदिवस साजरा करण्यात आल्याने माझ्यासाठी अविस्मरणीय असा होता. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यातील गोरगरीब लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) अभिप्रेत असलेल्या हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राज्यातील १८ पगड जाती १२ बलुतेदारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम स्वराज्यच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, स्वराज्य पक्षाची (Swarajya Party) वेगळी ताकद राज्यात निर्माण झाली असून ५ ते ६ महिने महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा करणार आहे. त्यानंतर पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसाला राजकारणात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय सामान्य कार्यकर्ता हा आमदार, खासदार झाला पाहिजे अशी आपली भूमिका असून येत्या २०२४ च्या निवडणुकीत (Election) स्वराज्य पक्ष सक्षमपणे राजकारणात उतरणार असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये (Nashik) जाणकारांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्राची दक्षा दीक्षा' या संदर्भात चर्चासत्र घेतले होते. त्यातून जनसामान्यांच्या प्रश्नांची निकड लक्षात आली. येत्या काळात राज्यभरात 'महाराष्ट्राची दक्षा दीक्षा' या संदर्भात चर्चासत्र आयोजित करुन राज्यातील समस्या, शेतकरी, पर्यटन, गडकोट किल्ले यासंदर्भात चर्चा करण्याचा मनोदयही छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.
राज्यपालांना उशीरा सुचलेले शहाणपण
राज्यपालांनी (Governor) दोन महिन्यापूर्वी राजीनामा (Resignation) द्यायला हवा होता. त्यांनी वेळोवेळी महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र त्यांना उशिरा शहाणपण सूचले असे संभाजीराजे म्हणाले. तसेच नव्याने पदभार स्विकारणार्या राज्यपालांनी महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती पुढे न्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.