
नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवार (दि.१९) रोजी नव्या संसद भवनामध्ये (New Parliament Building) विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन' विधेयक मांडले. या विधेकाच्या माध्यमातून आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना (Women) ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या विधेयकाचे देशभरात महिलावर्गासह सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर आज या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील या विषयावर चर्चा केली...
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलतांना अमित शहा (Amit Shah) यांनी भावावरून केलेल्या वक्तव्याचा दाखला देतांना प्रत्येक घरात असे भाऊ नसतात असे म्हटले. लोकसभेत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भाषणानंतर लगेच भाजप खासदार निशिकांत दुबे बोलण्यासाठी उभे राहिले. तेव्हा काँग्रेसकडून गोंधळ घालत सत्ताधारी पक्षाने पहिली संधी महिला खासदाराला द्यायला हवी होती असे म्हटले.
विरोधकांनी गोंधळा घातला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अचानक उभे राहिले आणि म्हणाले की, मी अधीर रंजन यांना विचारतो की महिलांची काळजी फक्त महिलाच करणार का? पुरुष करू शकत नाहीत का? तुम्हाला कोणत्या प्रकारचा समाज हवा आहे? महिला महिलांची काळजी, महिलांचे हित हे महिलांच्या पुढे जाऊन भावांनी पाहिले पाहिजे. ही देशाची परंपरा आहे, असे म्हटले. यावर उत्तर देतांना सुप्रिया सुळे यांनी मनातील खंत व्यक्त करत अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला विधेयकाचे मी स्वागत करते. महिला विधेयक चांगले आणि महत्त्वाचे आहे. महिला आरक्षणावर आज चर्चा सुरू आहे पण मी इतर काही मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छिते. सध्या कॅनडाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या समाजांच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत. त्यावर चर्चा झाल्यास आम्ही सरकारची साथ देऊ. अमित शहा यांनी एक विधान केले की, इथे भाऊ का करू शकत नाही, भाऊसुद्धा करू शकतो. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीच्या कल्याणाचा विचार करतात. प्रत्येकाचे नशीब इतके चांगले नसते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि अजित पवार हे भाजपसोबत गेल्याच्या घटनेशी जोडला जात आहे.
तसेच सुप्रिया सुळे यांनी पुढे महिला आरक्षणावर बोलतांना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक वैयक्तिक महिलांवर टीका करतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी मंत्री अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) केलेल्या वादग्रस्त विधानाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, "त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने (अब्दुल सत्तार) माझ्याविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरला. त्यामुळे भाजपने उत्तर द्यावे. जेव्हा आमचं कुणी बोलत असेल, तर इंडिया खराब आहे. आणि तुमचे मंत्री व्यक्तिगत टिप्पणी करतात. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबद्दल बोलतात. मी त्यावर काही प्रतिक्रिया देत नाही, कारण प्रतिक्रिया द्यावी इतक्या योग्यतेचे ते नाहीत, असेही सुळे म्हणाल्या.