
नवी दिल्ली | New Delhi
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Power Struggle) सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या सुनावणीत शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आज तुषार मेहता यांनी राज्यपालांची (Governor) बाजू मांडली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत...
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत बोलतांना म्हटले की, 'महाराष्ट्र (Maharashtra) राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. मात्र, अशा प्रकरणामुळे राज्याला कलंक लागतो. राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणं हे सरकार पाडण्याचे पाऊल होतं असे दिसून येत आहे. सरकार पडेल, अशी कोणतीही कृती राज्यपालांनी करायला नको होती, असे ते म्हणाले.
चंद्रचूड पुढे म्हणाले की, ३४ आमदारांनी त्यांचे मतभेद स्पष्ट केले. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारचे बहुमत खाली आले होतं. पण त्याचा परिणाम काय झाला? राज्यपालांनी त्यांना शिवसेनेचेच सदस्य म्हणून गृहीत धरायला हवं होतं. मग जर ते शिवसेनेच्या ५६ सदस्यांपैकीच असतील तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो? कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले. तसेच आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते. मात्र, अशा पद्धतीने विश्वासमत मागणे लोकशाहीसाठी घातक आहे. महाविकास आघाडीचा ३ वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला, असा सवाल सरन्यायाधीशांनी यावेळी उपस्थित केला.