मुंबई:
महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी सुबोध कुमार जयसवाल यांनी बुधवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या (CBI) संचालकपदाची सूत्र स्वीकारली. आता पुढील दोन वर्ष ते सीबीआय संचालक म्हणून काम पाहणार आहे. स्वच्छ प्रतिमेचे IPS अधिकारी अशी सुबोध कुमार यांची ओळख आहे. त्यामुळेच आजवरच्या आपल्या कारकीर्दीत ते फारसे वादाच्या भोवऱ्यात सापडले नाही. कोण आहेत सुबोध जयसवाल ? त्यांचा आणि नाशिकचा संबंध काय? आतापर्यंतची त्यांची कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे. जाणून घेऊ या...
सुबोध कुमार जयसवाल यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६२ रोजी झारखंडमध्ये झाला. ते १९८५ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीए केले. यूपीएससीच्या (UPSC) माध्यमातून आयपीएस (IPS) परीक्षा उत्तीर्ण केली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जयसवाल हे मुंबईचे पोलिस आयुक्त व राज्याचे डीजीपी (DGP) होते. २००८ सालापासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी रिसर्च अँड अॅनलिसेस विंग (RAW), इंटेलिजन्स ब्यूरो (IB) आणि SPG या सारख्या अतिशय प्रतिष्ठित संस्थांमधील वरिष्ठ पदांवर काम केले. त्यामुळे पोलीस खात्यासोबतच गुप्तचर यंत्रणांविषयी देखील त्यांना सखोल माहिती आहे. त्यांचे इंटेलिजेंस नेटवर्क खूपच मजूबत असल्याचे सांगितले जाते.
जयसवाल यांनी महाराष्ट्रातील पोलीस दलात देखील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. मुंबईतील २००६ रेल्वे बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. तसेच मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास देखील त्यांनीच केला होता. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे.
जयसवाल कोट्यावधी रुपयांचा तेलगी स्टँपपेपर घोटाळ्याच्या तपास करणाऱ्या पथकाचे प्रमुख राहिले आहेत. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी पोलीस दलातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची देखील कसून चौकशी केली होती. तसेच अनेक पोलिसांना अटकही केली होती.
२००८ साली केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या सुबोध कुमार यांना २०१८ साली पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोलवण्यात आले. तेव्हा ते 'रॉ'मध्ये अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. फडणवीस सरकारने त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करुन त्यांना राज्यात आणले. २०१९ साली त्यांना पदोन्नती देऊन महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक करण्यात आले.
CBI मध्ये २० आयपीएस अधिकाऱ्यांनी संचालक पद भूषवले आहे. त्यात महाराष्ट्र कॅडरच्या अवघ्या दोनच अधिकाऱ्यांचा आतापर्यंत नंबर लागला आहे. एम. जी. कात्रे हे महाराष्ट्र कॅडरचे पहिले आयपीएस अधिकारी होते. २८ फेब्रवारी १९८५ ते ३१ ऑक्टोंबर १९८९ पर्यंत ते या पदावर कायम होते. तत्कालीन राजीव गांधी सरकारने त्यांची सीबीआयच्या प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यानंतर सुबोध कुमार जयसवाल हे महाराष्ट्र कॅडरचे सीबीआयचे संचालक पद मिळवले दुसरे अधिकारी ठरले आहे.