Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानिर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील कोरोना संक्रमणाची साखळी तोडून तो नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे.त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही असे सांगून उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले.

काल रात्रीपासून निर्बंध लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी , पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका स्पष्टता ठेवा, असे ठाकरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने दुर्बल घटक आणि गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

करोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे, असे ठाकरे यांनी सांगितले.

ऑक्सिजनचा उचित आणि योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्नि सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावे.,यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत.मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना ठाकरे यांनी केल्या.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तसेच राज्याच्या आणिजिल्ह्यांच्या टास्क फोर्सचे डॉक्टर्स आदी या बैठकीत सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या