Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामान्सूनची वाट बघावीच लागणार

मान्सूनची वाट बघावीच लागणार

नाशिक । प्रतिनिधी

मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यन्त पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार दि.२२ जून पर्यन्त तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाच्या साधारण वळवाच्या सरींची शक्यता जाणवते.दि. २२ जूनपर्यन्त हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच कदाचित मर्यादित असु शकतो,त्यामुळे दि. २३ जुननंतरच नैऋत्य मान्सूनचा प्रवेश होईल असा अंदाज पुणे वेध शाळेचे निवृत्त हवामान तद्न्य माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

- Advertisement -

पूर्वमोसमी वळीव पावसाच्या सध्याच्या ह्या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगनातून संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात साधारण शुक्रवार दि.२३ जून ला नैऋत्य मान्सून प्रवेशित होऊ शकतो.मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखाही उर्जीतावस्थेत येण्याची शक्यता जाणवते.

दरम्यानच्या या कालावधीतच (२३ ते २९ जुन) तळ कोकणसहित संपूर्ण कोकण व गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होवुन, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. म्हणजेच २३ ते २९ जुन या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.

विदर्भात मात्र सध्य:स्थित असलेली दिवसाची उष्णतेची लाटसदृश स्थिती व रात्रीची दमट वातावरणतून होणारी अस्वस्थता, घालमेल सोमवार दि.१९ जूनपर्यन्त कदाचित कायम राहू शकते, असे वाटते. उर्वरित महाराष्ट्रातील तापमानात मात्र विशेष फरक जाणवणार नाही.

‘ हिंद महासागरीय द्विध्रुवीता ‘ (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी) धन अवस्थेकडे झुकण्याचे अपेक्षित असतांना सध्या तो ही फारच बळकट स्थितीत आहे, असे समजु नये. असे वाटते.दि. २३ जूनला सुरु होणाऱ्या व दि. ६ जूनला संपणाऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अशा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.

म्हणजेच दि. ७ जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा.कारण ७ जुलैनंतरच्या आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते,असे एकंदरीत वाटते.

‘ बिपोरजॉय ‘ चक्रीवादळ सध्या त्याच्या संलग्नित हवेचा दाब तीव्रतेच्या उतरत्या पायरीने सध्या हवेच्या तीव्र कमी दाबाच्या म्हणजे ‘ डिप्रेशन ‘अवस्थेत राजस्थानातील बारमेर, जोधपूर शहरांच्या वायव्येकडे असुन पुढील २ दिवसात अजमेर, जयपूरच्या वायव्येकडून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते.

त्याच्या दोन दिवसाच्या अस्तित्व कालावधीत व मार्गस्थ पूर्व राजस्थानच्या भागात जोरदार पावसाची शक्यता जाणवते.बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तसेच सिमला कुलू मनाली, देहाराडून व सभोवतालचा परिसरात गुरुवार दि.२२ जून पर्यन्त गडगडाटीसह वारा, वीजा, गारासह अवकाळी वातावरण व पावसाची दाट शक्यता जाणवते. ह्या कालावधीत तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी ह्याचीही नोंद घ्यावी, व सुरक्षित असेल तरच हिमालयीन चढाई करावी,असा सल्लाही माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या