सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे नाशिकमध्ये आता रात्रीची संचारबंदी सुरु झाली. तब्बल ४४ दिवसांनंतर एका दिवसात तीनशेहून आधिक रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून मिळत आहे. परंतु सर्वच नाशिककर अजूनही मास्क वापरत नाही.
प्रशासनाकडून सक्ती, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनानंतरही बिनधास्तपणे काही नाशिककर मास्क न वापरता फिरत आहे. त्यांना कोरोनाची भीती नाही पण इतरांना आहे? त्याकडे ते लक्ष देण्यास तयार नाहीत.
नाशिक शहरात कोरोनामुक्तीची वाटचाल गत महिन्याच्या अखेरपर्यंत वेगात होती. मात्र आता आठवडाभरात कोरोना रुग्णांच्या वाढीस प्रारंभ झाला असून हा वेग सातत्याने वाढत आहे.
गत आठवडाभरात तर सातत्याने बाधितांची संख्या अडीचशे, तीनशेहून अधिकच राहिली. तसेच मृतांचा आकडादेखील एक किंवा दोनवरून तीनवर पोहोचला आहे.
महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये ९६.२७ टक्के, नाशिक शहरात ९७.३८ टक्के, मालेगावमध्ये ९२.१६ टक्के तर जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ इतके आहे. नाशिक ग्रामीण ८२१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७६ व जिल्ह्याबाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.