नवी दिल्ली । वृत्तसंस्था
यंदाच्या दिवाळीत धनोत्रयोदशीला देशात 40 टन सोन्याची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 30 टक्के अधिक सोन्याची विक्री झाली.
20 हजार कोटी रुपयांपर्यंत सोने खरेदी झाल्याचे ‘आयबीजेए’ या ज्वेलर्स संघटनेने म्हटले आहे.
‘आयबीजेए’ने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी देशात 12 हजार कोटी रुपयांचे सोने विकले गेले होते. यंदा हाच आकडा 20 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे, गेल्या वर्षीच्या धनोत्रयोदशीला 30 टन सोन्याची विक्री झाली होती. त्या तुलनेत यावेळी 30 ते 35 टक्के विक्री वाढली आहे.
सोन्याची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 8 महिन्यांच्या काळात टाळेबंदीमुळे ग्राहकांना सोने खरेदी करणे शक्य झाले नाही. आता झालेली वाढ हा त्याचा परिणाम आहे.
लवकरच लग्नांचा हंगाम सुरू होईल. धनोत्रयोदशीनिमित्ताने ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या खरेदीची पर्वणी साधली आहे. प्रतितोळा 56 हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता थोडीफार कमी झाली आहे. शुक्रवारी प्रतितोळा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजारांपेक्षा जास्त होती.