
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून दर दिवसाआड अपघाताची मालिका सुरूच आहे. अशातच 40 टक्के अपघात ‘साईड डॅश’मुळे, 33 टक्के अपघात महामार्ग संमोहनाची क्रिया काम करत असल्याने होत असल्याचे समोर आले आहे. तर लेन कटींगमुळे चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचाही अवधी मिळत नसल्यामुळे समद्धी महामार्गाला अपघाताचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे...
समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर शंभर दिवसांतच तब्बल 900 अपघात आणि 31 जणांचा मृत्यू झाल्याचे अभ्यासातून समोर आले होते. अपघातांचे सत्र अद्याप सुरु आहे. वाहनांचा अतिवेग, तांत्रिक बिघाड यामुळे 46 टक्के अपघात झाले.
15 टक्के अपघात टायर पंक्चर झाल्यामुळे तर 12 टक्के अपघात टायर फुटल्यामुळे झाले होते. चालक झोपी जाणे, ही अपघाताची सुरुवातीला प्रमुख कारणे सांगितली गेली. समृद्धीवर वळणे कमी असली, तरी अतिवेगाची धुंदी अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे कारण समोर आले होते.
शिवाय लेनची शिस्त न पाळल्यामुळेदेखील अनेक अपघात घडले. काही ठिकाणी माकडांचा वावर, वन्यप्राणी रस्त्यावर अचानकपणे आडवे आल्यानेही दुर्घटना घडल्या. अपघाताचे आणखी एक प्रमुख कारण 3 पदरी 2 स्वतंत्र ट्रॅक आहेत. समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न नाही; मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे ‘साईड डॅश’मुळे झाले आहेत. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसर्या लेनवर जातांना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे मागून येणार्या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित हालचाल असते.
त्यातच महामार्ग संमोहनाची क्रिया काम करत असल्याने चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचीही संधी मिळत नाही. त्यामुळे ‘साईड डॅश’ होऊन भीषण अपघात होत आहेत, असे या संशोधनात पुढे आले आहे. महामार्ग संमोहनाची भर पडली आहे. सध्या तरी शिर्डी ते नागपुर वाहतूक सुरु आहे. डिसेंबर अखेर शिर्डी ते मुंबई पर्यंत रस्ता खुला होणार आहे. मात्र आताच डिसेंबर 2022 ते एप्रील अखेर पर्यंत 358 अपघात झाले. 24 अपघातांमध्ये तर 39 जणांचे प्राण गेले. 54 अपघातांमध्ये 143 जण कायमचे अपंग झाले.
राज्याची राजधानी ते उपराजधानी या दोन महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवास 16 तासांऐवजी आठ तासावर येणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडत इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत.
त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना याचा लाभ होईल. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यातून भाजीपाला, फळे, इतर काही वस्तू जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईत पोहोचवणे सोपे होईल हे सर्व खरे असले तरी वाढते जीवघेणे अपघात मात्र आनंदावर विरजन पाडत आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण, ज्या उद्देशाने या महामार्गाची उभारणी झाली, तो पूर्ण होतोय का, हा कळीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
समृद्धीवर 30 टक्के छोटी वाहने व 20 छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडतात. 51 टक्के ट्रकचालक मार्गिका पालन करत नाहीत. वळण मोजके असली तरी त्यांचा घेरा मोठा आहे. चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. चालकांकडून मार्गिका पालन न केल्याने 11 टक्के अपघात झाले. टायर फुटून 34 टक्के अपघाताला कारणीभूत ठरले. चालकाचे लक्ष विचलित झाल्याने 24 टक्के अपघात झाले आहेत. भ्रमणध्वनीचा वापर 8 टक्के अपघाताला कारणीभूत ठरला.
समृद्धी महामार्गाची डावीकडची पहिली लेन जड वाहनांसाठी असून कमाल वेग 80 किमीचा आहे. त्याच्या बाजूला कार व इतर वाहनांची लेन असून वेग 120 चा आहे. उजवीकडे सर्वात शेवटची ओव्हरटेक लेन आहे. लेन बदलताना सावधगिरी न बाळगल्यास अपघातांचा धोका वाढतो. टायरमधील हवेची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. वाहनांचा वेग आणि सातत्याने वाहन चालवल्यास टायरचे तापमान वाढून टायर निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे टायर नायट्रोजनयुक्त असावे असे सांगितले जात आहे.