
नाशिक | Nashik
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) तीन वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या डॉ.सुधीर तांबेंना (Dr. Sudhir Tambe) उमेदवारी दिली होती. पंरतु,अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी डॉ. तांबे यांनी स्वत:चा अर्ज दाखल न करता पुत्र सत्यजित तांबेंचा (Satyajit Tambe) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानंतर या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली होती.यानंतर ठाकरेंनी तात्काळ होकार दर्शवत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
यानंतर तांबे आणि पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाचा (Nashik Graduate Constituency) कानाकोपरा पिंजून काढत प्रचार केला होता. एकीकडे तांबे यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळाला होता. तर पाटील यांच्यासाठी ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार केला. मात्र, शुभांगी पाटील मविआच्या उमेदवार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (Congress and NCP) त्यांचा प्रचार केला नाही किंवा अनेक ठिकाणी त्यांचे बुथ नव्हते, असा आरोप केला जात आहे. त्यावर आता स्वतः शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाल्या की, मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही याविषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकासआघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केले नाही, असा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, अनेक ठिकाणी माझे बुथही लागले नव्हते हे मला माध्यमांमधूनच कळाले. माझा बुथ प्रत्येक ठिकाणी होता. काही ठिकाणी दोन लोकं असतील, मात्र प्रत्येक ठिकाणी बुथ लागला होता. मी मोठ्या फरकाने विजय होईल. मी नावानिशी कुठं किती मतदान झालं हे सांगू शकेन, असे मत शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले.