
मुंबई | Mumbai
नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Election) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) झालेल्या जगावाटपमध्ये नाशिक पदवीधरची जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली होती. त्यामुळे कॉंग्रेसने (Congress) याठिकाणाहून डॉ.सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली. परंतु,डॉ. तांबेंनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला.
त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतर आता शुभांगी पाटलांनी थेट सत्यजित तांबेंना आव्हान दिले आहे.
शुभांगी पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली असून त्यात म्हटले की, महाविकास आघाडीने आपला अधिकृत उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्म देखील दिला. तसेच भाजपकडून (BJP) दोन जणांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊ असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती.
विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत. सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार, ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर पाटील म्हणाल्या की, ठाकरे गटाने (Thackeray Group) पाठिंबा दिल्याप्रमाणेच महाविकास आघाडीनेही पाठिंबा दिला तर माझ्या कामाच्या बळावर मी राज्यातील पहिली महिला पदवीधर आमदार बनू शकते. याशिवाय पदवीधर उमेदवारांसाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत असून ४५ ते ५० हजार भावांना घेऊन मी आझाद मैदानावर ६ दिवस अन्न व जलत्याग आंदोलन केले होते. त्यामुळे माझ्या कामासाठी मला तरुण निवडून देतील, असे त्यांनी सांगितले.