मुंबई | Mumbai
तब्बल १०३ दिवसांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत शिंदे गटावर ( Shinde Group) टीकास्र सोडले आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची शक्यता आहे...
नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर (Shiv Sena MP Gajanan Kirtikar) यांचे पुत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar)अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे - फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले की, अमोल कीर्तिकर हे आमच्यासोबत आहे. अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) सोबत काम करत आले आहे. ते कडवट शिवसैनिक आहे. ते शिवसेनेसोबतच आहे. गजानन भाऊंनी वेगळा निर्णय घेतला. पण मुळ शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. आमच्यासोबत आनंद कीर्तिकर आहे. मला जेलमधून निघून एवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद आज मला भेटायला आले त्यामुळे झाला आहे. यांच्यासोबत शिवसेनेचा प्रवाह पुढे जाणार आहे, असेही राऊतांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण अत्यंत अस्थिर झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. दिल्लीत सुद्धा याबद्दल तयारी सुरू असल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे.
तसेच महाराष्ट्रातून एक एक प्रकल्प हे राज्याबाहेर जात आहे. आपल्याकडचे प्रकल्प ओरबाडून नेले जात आहे. यावर चिखलफेक करण्यापेक्षा एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. राजकारण करण्यासाठी, राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभे आयुष्य पडले आहे. जर महाराष्ट्र खचला तर आपल्याला राजकारण करण्यासाठी काहीच उरणार नाही, याचं भान राजकारण्यांनी ठेवले पाहिजे. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा, एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा संवाद साधण्याची गरज असल्याचे राऊत म्हणाले.