शिवसेनेतील फुटीला बंडखोर नव्हे तर ‘हे’ जबाबदार – उद्धव ठाकरे

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना आपल्याकडे वळवल्यानंतर आता १२ खासदारांनाही आपल्या गटात सहभागी करुन घेतले आहे. तर एकीकडे शिवसेना (shivsena) फुटत असतांना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुट रोखण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात (ShivSena Bhavan) दररोज अनेक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांसोबत बैठका घेत आहेत.

आज उत्तर भारतीय महासंघाच्या (North Indian Federation) मुंबईतील (Mumbai) पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवन येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली. या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत पडलेल्या फुटीला बंडखोर आमदार (Rebel MLA) नाही, तर भाजप जबाबदार असून तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या. पण धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. तसेच भाजपच (BJP) शिवसेना संपवत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे (crises) आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे.संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हे ही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू शिवसेना पुन्हा उभी करु, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *