विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Workers Strike)गेल्या कित्येक दिवसांपासून रुतलेले एसटीचे चाक अजूनही हालत नाही. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe)यांनी आतापर्यंत २६ हजार ५०० कर्मचारी कामावर आल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले गेले आहे.
महामंडळाने कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते, मात्र अपवाद वगळता कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे महामंडळाने हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ९२ हजारांपैकी २१०० कर्मचारी बडतर्फ करण्यात आले तर जे कर्मचारी कामावर परत येत आहे त्यांचे निलंबन रद्द केले जात असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले. बडतर्फ कर्मचाऱ्यांवर प्रक्रियेनुसाच कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष शेखर चन्ने (Shekhar Channe) म्हणाले की, ‘संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नाही. त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली. त्यानंतरही तीन वेळा त्यांना हजर राहण्याची संधी देण्यात आली. पण तरीही ते रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु झाली आहे.
शेखर चन्ने म्हणाले, “संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत.”
“बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितलं होतं की बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचं आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावं. बरेचश्या कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे,” असं शेखर चन्ने यांनी नमूद केलं.