मुंबई | Mumbai
राज्यात शिवसेनेत (Shivsena) झालेली बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार (MLA) खासदार (MP) त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर या सगळ्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे एकाकी पडल्याचे दिसत आहे.
अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray)हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याविषयी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केले आहे.
यावेळी शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल. त्यांची साद आधी येऊ द्या, नंतर पुढचे पाहू असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब (Thackeray Family) पुन्हा एकत्रित येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, एकीकडे राज ठाकरे यांचा तरुणाईत खूप मोठा चाहता वर्ग आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची राज्याचा कुटुंबप्रमुख, साधा माणूस अशी छवी सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील हे दोन्ही बडे नेते एकत्रित आले तर त्याचा महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो.