
मुंबई | Mumbai
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह भाजप- शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
याबाबत सर्वच पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात असून खुद्द राष्ट्रवादीच्या (NCP) काही आमदारांनी (MLA) अजित पवारांना आपला उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता या सर्व राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचे काम कुणीतरी करत आहे. त्याला काहीही अर्थ नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरते सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करायचे या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही, असे शरद पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, मी वर्तमानपत्रात वाचले की आमदारांची बैठक वगैरे आहे. मात्र ही १०० टक्के खोटी गोष्ट असून पक्षाची अशी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. तसेच अजित पवार पक्षाचे काम करत असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यामुळे या सर्व अफवा असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष आजही शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. बातम्या येतात ४० फुटले, ५० फुटले. परंतु, अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्या खोट्या आहेत. भाजपकडून त्यांच्याबाबत अफवा, वावड्या उठविण्यात येत असून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे तसे काहीही होणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.